ळूहळू आम्ही शहराच्या बाहेर पडलो. रस्ता आसाम आणि मेघालयाच्या सीमेच्या जवळून जात होता. छोट्या टेकड्या, मधूनमधून वळणं आणि दोन्ही बाजूंना हिरवाई. रस्त्यांची स्थिती खूपच चांगली होती. दुपार सरत होती आणि संध्याकाळ जवळ येत होती. एकंदरीत दिवसाची सुरुवात थोडी गडबडीतच झाली होती. साडेबाराच्या सुमारास आम्ही एअरपोर्टजवळच्या हॉटेलमधून निघालो होतो. त्यानंतर पिकअप व्हेईकल, बाईक्स अलॉट होणं, पेपरवर्क, ओळखीपाळखी आणि मग थेट राईडची सुरुवात. या सगळ्या गडबडीत दुपारचं जेवणच राहून गेलं होतं. आता चार-साडेचार वाजत आले होते आणि प्रचंड भूक लागली होती. मग एका छोट्याशा ढाब्यावर आम्ही थांबलो. आत शिरलो आणि मिळेल ते काहीतरी मागवलं. तशी ती विचित्र वेळ होती. जेवणाची थाली मागवावी की चहा आणि मॅगी हेच कळत नव्हतं. त्यात त्या हॉटेलमध्ये फारसे पर्यायही नव्हते. शेवटी मॅगी आणि चहा मागवला आणि बाहेर आलो. बाहेर येऊन बघितलं तर काळोख पडलेला. घड्याळात पावणेपाच वाजले होते. एका क्षणात जाणीव झाली की आपण देशाच्या किती पूर्वेला आलो आहोत. मुंबईत याच वेळी अजून लख्ख दुपार असती आणि इथे मात्र संध्याकाळ संपून अंधार पडला होता. त्या क्षणी भारत किती प्रचंड मोठा देश आहे याची जाणीव अक्षरशः अंगावर आली. ईशान्य भारतात सूर्योदय आणि सूर्यास्त लवकर होतात हे वाचून माहिती होतं. पण टेक प्रत्यक्षात अनुभवणं म्हणजे वेगळाच प्रकार होता. नकाशावर दिसणारं अंतर आणि प्रत्यक्ष जगलेलं अंतर यात किती मोठा फरक असतो हे अशा वेळी समजतं.
अनवट ईशान्य भारत – भाग १ – गुवाहाटी
ईशान्य भारत. भारताच्या नकाशात फुलपाखराच्या पंखासारखा दिसणारा हा प्रदेश मला लहानपणापासूनच खुणावत आला होता. इथली घनदाट अरण्यं, धुक्याने वेढलेले डोंगर, प्रचंड नद्या, उंच धबधबे, हिरवागार निसर्ग आणि उत्तरेला उभ्या असलेल्या हिमशिखरांच्या कथा अनेकदा वाचनातून भेटल्या होत्या. टीव्हीवरील माहितीपट, युट्यूबवरील ट्रॅव्हल व्लॉग्स आणि अलीकडच्या काळात इंस्टाग्रामवरील रील्समधून हा प्रदेश वारंवार समोर येत राहिला. पण प्रत्यक्ष तिथे जाण्याची संधी मात्र काही मिळत नव्हती.