अनवट ईशान्य भारत – भाग ५ – जसवंतगड युद्धस्मारक

रायफलमन जसवंतसिंग रावत यांनी दाखवलेल्या अद्वितीय शौर्याच्या स्मरणार्थ उभारलेलं हे स्मारक आजही त्या युद्धाची साक्ष देत उभं आहे. १९६२ मध्ये इथे घडलेला संघर्ष Battle of Nuranang म्हणून प्रसिद्ध आहे. स्थानिक मोनपा समाजातील सेला आणि नुरा या दोन तरुणींच्या मदतीने जसवंत सिंग यांनी तब्बल बहात्तर तास विविध ठिकाणांहून गोळीबार करत चिनी सैन्यासमोर संपूर्ण भारतीय तुकडी लढत असल्याचा आभास निर्माण केला. आपल्या दोन सहकाऱ्यांसोबत पुढे जाऊन एक चीनी मशीनगन हस्तगत केली. मात्र यात त्यांच्या सहकाऱ्यांचा मृत्यू झाला. ते सुद्धा जखमी झाले. त्यांच्या मृत्यूबाबत आजही वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. काहींच्या मते त्यांनी अखेरची गोळी स्वतःवर झाडली, तर काहींच्या मते चिनी सैन्याने त्यांना पकडून ठार मारलं. पण त्यांच्या पराक्रमामुळे ते भारतीय लष्कराच्या इतिहासातील अमर वीर ठरले. ज्या बंकरच्या आधारे जसवंत सिंह यांनी ही खिंड लढवली त्याच परिसरात आज हे स्मारक उभे आहे.

अनवट ईशान्य भारत – भाग ४ – दिरांग ते तवांग मार्गे सेला पास

काही मिनिटांनी समोर एक भव्य कमान दिसू लागली. ते होतं तवांग जिल्ह्याचं प्रवेशद्वार. त्या कमानीतून पुढे जाताच लक्षात आलं की आपण सेला पासच्या परिसरात पोहोचलो आहोत. हा आमच्या संपूर्ण प्रवासातील सर्वोच्च बिंदू. उंची जवळपास चार हजार दोनशे मीटर. आणि त्या क्षणी जणू निसर्गाने आमच्यावर प्रसन्न होण्याचं ठरवलं. ढग बाजूला सरकले. स्वच्छ सूर्यप्रकाश पडला आणि समोर शांतपणे विसावलेलं सेला सरोवर दिसू लागलं. क्षणभर आम्ही सगळे स्तब्ध झालो. समोर शांत निळं सरोवर पहुडलं होतं. आजूबाजूचे बोडके डोंगर त्यात आपलं रुपडं न्याहाळत होते. त्यांच्या उतारांवर लहान लहान झुडपांचे लालसर आणि पिवळसर रंग उठून दिसत होते. कदाचित शरद ऋतूची चाहूल लागली असावी. त्या परिसरात एक विलक्षण शांतता होती. थंड वारा अंगावर झोंबत होता, पण त्या दृश्याकडून नजर हटत नव्हती.