विविधरंगी बस्तर – भाग १ – बस्तरची तोंडओळख

काही दिवसांपूर्वीच “न्यूटन” चित्रपट पाहिला होता. त्यातली नाट्यमयता आणि कलाकारांचा अभिनय अप्रतिमच. पण त्याहूनही मनात भरलं होतं ते छत्तीसगढ मधल्या दुर्गम प्रदेशातलं अरण्य. रानावनाची ओढ पहिल्यापासूनच. त्यात फारसा परिचित नसलेला प्रदेश आणि अनवट निसर्गासोबत तोंडी लावायला मिळणारं अद्भुत लोकजीवन पाहून मी मोठ्या उत्सुकतेने छत्तीसगढला जाण्यासाठी माहिती शोधू लागलो. गुगलवर तर माओवाद्यांनी केलेले हल्ले आणि त्यात मारले गेलेले पोलीस किंवा नागरिक याव्यतिरिक्त काही दिसतच नव्हतं. आधीच दुर्गम प्रदेश आणि त्यात असे असुरक्षित वातावरण. त्यामुळे एकट्याने प्रवास करणे जरा अवघडच होणार होते. योगायोगाने एका माहितीतल्या ग्रुपने पुढच्याच महिन्यात चार दिवसांची बस्तर ट्रीप आयोजित केली असल्याचे फेसबुकवर वाचनात आले. सुट्टीचं आणि पैशाचं गणित जुळतंय हे बघून मी ताबडतोब ट्रीप बुक करून टाकली.

बस्तर जिल्ह्याचे स्थान 
बस्तर म्हणजे दक्षिण-पूर्व छत्तीसगढमधला ओदिशाच्या सीमेला लागून असलेला जिल्हा. दख्खनचे पठार आणि पूर्व घाट यांच्या सीमेवर असलेला बस्तर जिल्हा समुद्रसपाटीपासून सुमारे ६०० मीटर उंचीवर वसलेला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात हे एक संस्थान होते. सध्याचे बस्तर, दांतेवाडा आणि कांकड असे तीन जिल्हे मिळून या संस्थानाचा पसारा होता. साधारण १५०००० लोकवस्ती असलेले जगदालपूर आज जिल्ह्याचे मुख्यालय आहे. जिल्ह्यातली ७०% लोकसंख्या आदिवासी असून गोंड, भरता, आणि मारिया या त्यांपैकी मुख्य जमाती होत. बऱ्याच जमाती अजूनही सुदूर घनदाट अरण्यांत राहतात आणि बाहेरील लोकांशी फारशा मिसळत नाहीत. पूर्वापार चालत आलेल्या त्यांच्या प्रथा-परंपरा अजूनही टिकून आहेत. बस्तरमध्ये दसऱ्याच्या दिवशी होणारा लोकोत्सव हा सुप्रसिद्ध आहे. आमची ट्रीप दसऱ्याच्या सुमारासच आयोजित केलेली होती. या वर्षीचा परतीचा पाऊस रेंगाळला होता. नवरात्र सुरु झाले तरी अधूनमधून सरी येत होत्या. त्यामुळे कोसळणारे धबधबे आणि हिरव्यागार वनराईसोबत एक वेगळा सांस्कृतिक अनुभव मिळणार या विचाराने मी भलत्याच उत्साहात होतो. 

यथावकाश प्रवासाचा दिवस उजाडला. संध्याकाळी साडेआठला सुटणाऱ्या समरसता एक्स्प्रेसचे आरक्षण होते. यावेळी ग्रुप केवळ दहा जणांचा होता. सगळ्यांशी ओळखी-पाळखी झाल्या आणि आमचा प्रवास सुरु झाला. मुंबई ते रायपूर म्हणजे सुमारे अठरा तासांचा प्रवास. एवढा प्रवास, तोही स्लीपर कोचमधून करायचा म्हणजे मी थोडा धास्तावलोच होतो. पण ऑफ सिझन असल्याने गाडीला विशेष गर्दी नव्हती. दिवसभरच्या दगदगीने मी शिणलो होतो. बर्थ मिळताच आडवा झालो. स्लीपर कोच मधल्या कोलाहलातली झोप म्हणजे यथा-तथाच. थोडाफार वेळ डोळा लागला तरी खूप. म्हणता म्हणता गाडी रायपूरला पोहोचली. भारतीय रेल्वेच्या वक्तशीरपणाचा मान राखत गाडीने चांगला दीडेक तास उशीर केला होता. लांबच्या प्रवासाने आम्ही सगळेच कंटाळले होतो. त्यात पावसाची चिन्हं दिसत होती. त्या उष्ण आणि दमट हवेत जीव नकोसा होत होता. इथून पुढे बस्तरमधली एक स्थानिक पर्यटन कंपनी आमची व्यवस्था बघणार होती. त्या कंपनीचे प्रतिनिधी पार्किंगच्या जागेत आमची वाट बघत थांबले होते. आम्ही येताच त्यांनी गळ्यात हार आणि कपाळाला गंध लावून आमचे जंगी स्वागत केले. इतक्या प्रसन्न स्वागताने आमचा शिणवटा कुठच्या कुठे पळाला! मोठ्या उत्साहात आम्ही बसमध्ये बसलो. 

रायपूरमध्ये झालेले जंगी स्वागत 

आमचा पहिला मुक्काम होता चित्रकोट धबधबा. रायपूरहून तिथले अंतर होते सात तासांचे! थोडक्यात प्रवास अजून संपला नव्हताच! मजा-मस्ती करत आमची गाडी चित्रकोटकडे निघाली. वाटेत थोडा वेळ जेवणासाठी थांबून आम्ही पुढे रवाना झालो. अंधार पडल्याने आजूबाजूचा निसर्ग काही अनुभवता येत नव्हता. मी गुमान कानात हेडफोन घालून झोपायचा प्रयत्न करू लागलो. निद्रादेवी काही प्रसन्न होत नव्हती. अखेरीस रात्री एकच्या सुमारास आम्ही चित्रकोट धबधब्याला पोहोचलो. बसमधून उतरलो आणि एक ओलसर गारवा अंगाला जाणवला. दूर कुठेतरी पाण्याचा प्रचंड आवाज घुमत होता. अंधारात चाचपडत आम्ही कॅम्पिंग साईटवर पोहोचलो. कंपनीचा संचालक जीत सिंग तिथे स्वागताला हजर होता. तिथल्या आदिवासी सहाय्यकांनी ढोल वाजवून आणि हातात रानफुले देऊन सगळ्यांचे स्वागत केले. इथल्या लोकांनी “अतिथी देवो भव” फारच मनावर घेतलेले दिसत होते. त्यांच्या स्वागताच्या पद्धती कितीही छान असल्या तरी त्यांना छान म्हणण्याइतकेही त्राण आता अंगात उरले नव्हते. आता मात्र झोप अनावर होत होती. एकदाची तंबूत बॅग टाकली आणि निद्राधीन झालो.            
क्रमशः 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *