नयनरम्य बाली – भाग 1 – तोंडओळख आणि सहलीची सुरुवात Beautiful Bali – Part 1 – Introduction and the beginning of the trip

बाली – इंडोनेशिया या अगणित बेटांच्या देशातील एक लहानसे नयनरम्य
बेट. तसं बाली पर्यटनाच्या नकाशावर जगप्रसिद्ध आहे. त्यामुळे फारशी ओळख करून द्यायची
गरज नाही. पण उपचारापुरती या बेटाची काही वैशिष्ट्ये सांगतो. बेट असल्याने इथे सुंदर
समुद्रकिनारे तर आहेतच
, पण मध्यवर्ती भागात एक नव्हे तर तीन ज्वालामुखी
आहेत. यांपैकी अगुंग आणि बतूर सक्रीय आहेत. बालीच्या आजूबाजूचा समुद्र हा सागरी जैव
विविधतेने युक्त असून इथे अनेक प्रदेशनिष्ठ प्रजाती आढळतात. सगळ्यात उल्लेखनीय
गोष्ट म्हणजे हिंदू परंपरा आणि चालीरीतींचा प्रभाव असलेला इथला समाज. बालीमध्ये पर्यटनाला
साधारण १९६० च्या दशकात सुरुवात झाली. अल्पावधीतच हे लहानसे बेट आशिया खंडातले एक महत्त्वाचे
पर्यटन स्थळ बनले. सागरी क्रीडाप्रकार
, ट्रेकिंग, किनाराभ्रमंती, पार्टिंग
आणि नाईटलाईफ
, किंवा अगदी कौटुंबिक सहल, असा कोणताही
पर्यटन प्रकार बालीसाठी त्याज्य नाही. मग तुम्ही बॅकपॅकर असा किंवा हनिमूनर
, बालीमध्ये
तुमच्यासाठी काही ना काही आहेच. तर असे हे वैशिष्ट्यपूर्ण बेट माझ्या बकेटलिस्ट वर
बऱ्याच वर्षांपासून होते. दक्षिण गोलार्धात असल्याने बालीमध्ये ऑक्टोबर ते फेब्रुवारी
असा पावसाळा असतो. त्यामानाने मे ते सप्टेंबर वातावरण सौम्य आणि आल्हाददायक असते. त्यात
जुलै आणि ऑगस्ट म्हणजे इथला पीक सिझन. या महिन्यांत युरोप मध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्या
असल्याने तिथल्या पर्यटकांचा मोठा ओघ असतो. तसेच
, ऑस्ट्रेलियामध्ये थंडीचे
दिवस असल्याने तिथूनही पर्यटक मोठ्या प्रमाणात किनारा पर्यटनासाठी येतात. त्यातल्या
त्यात कमी गर्दीचा आणि कमी उन्हा-पावसाचा म्हणून मी जून महिना तिथे जायला निवडला. एयर
एशिया त्रिचीवरून अगदीच स्वस्तात तिकिटे देत होती. म्हणजे
, बंगलोर
वरून जेवढे तिकीट होते त्याच्या अक्षरशः निम्म्या किमतीत त्रिचीहून तिकीट मिळत होते.  झटक्यात तिकीटं काढली आणि सहलीच्या दिवसाची वाट
बघू लागलो.

एका दृष्टिक्षेपात बाली


त्रिचीवरुन सकाळी साडे नऊचे विमान होते. आदल्या दिवशी
बंगलोरहून स्लीपर बसमध्ये बसलो. वेळापत्रकानुसार सकाळी सहा वाजता त्रिचीला पोहोचणे
अपेक्षित होते. पण साडेसहा वाजत आले तरी बस अजून नमक्कललाही पोहोचली नव्हती. आता
मात्र माझा जीव खालीवर होऊ लागला. विमान चुकते की काय अशी भीती वाटू लागली. एकदाची
पावणे आठ वाजता बस त्रिचीला पोहोचली. मी लगबगीत खाली उतरलो आणि समोर दिसली त्या
रिक्षात बसलो. चालकाला म्हटलं शक्य तितक्या लवकर विमानतळावर पोहोचव. नशिबाने त्रिचीचा
विमानतळ शहराच्या जवळच होता. दहा मिनिटातच तिथे पोहोचलो. एकदाचं चेक इन केलं आणि
सुटकेचा निश्वास टाकला. यथावकाश विमानाने उड्डाण केलं. थोडी उंची गाठताच कावेरीचं विशाल
पात्रं
, आजूबाजूची भातशेती, आणि श्रीरंगमच्या प्राचीन मंदिराची उत्तुंग गोपुरं दिसू लागली.
या सगळ्या प्रदेशाला
rice bowl of India असे म्हणतात.
हा तोच प्रदेश जिथे चोळ राजांनी कित्येक शतके राज्य केले. तंजावर आणि श्रीरंगम सारखी
मंदिरे बांधली. कावेरीच्या खोर्‍याचे विहंगम दृश्य पाहताना तिथला इतिहास डोळ्यांसमोर
तरळत होता.
   

त्रिची ते क्वालालांपूर आणि तिथून बाली असा एकूण 13 तासांचा
प्रवास होता. विमानप्रवास म्हणजे एक दिव्यच असतं. त्यात एखाद्या ठिकाणी लांब ले-ओवर
असेल तर अजूनच कंटाळा येतो. एकदाचा स्थानिक वेळेनुसार रात्री एक वाजता मी बालीच्या
देनपसार विमानतळावर उतरलो. इमिग्रेशनला ही भली मोठी रांग. आधीच एवढा मोठा प्रवास. त्यात
आदल्या रात्रीची बसमधली अपुरी झोप. कधी एकदा हॉस्टेल वर जाऊन अंग टेकतोय असं झालं होतं.
तेवढ्यात काही मराठी शब्द कानावर पडले. पाहतो तर एक वयस्क जोडपं मागेच उभं होतं. काका-काकू
मुंबईचेच होते. आठ दिवसांच्या बाली ट्रीपला आले होते. मग त्यांच्याशी गप्पा मारू लागलो.
म्हणता म्हणता दोन  तासांची ती इमिग्रेशनची
रांग संपली. काका-काकूंना बाय बाय करून मी विमानतळाच्या बाहेर पडलो. हॉस्टेल जवळच
होतं. त्या परिसरचा ऑफलाइन नकाशा मी आधीच डाउनलोड करून ठेवला होता. बस किंवा
टॅक्सी काही न बघता मी सरळ चालत सुटलो. परक्या देशात निर्जन रस्त्यावरून रात्री
तीन वाजता चालताना जरा धाकधूक वाटत होती खरी. पण एवढ्याशा अंतरासाठी उगीच कशाला
खर्च करा
? मनाचा ठिय्या
करून मी नकाशा बघत बघत चालू लागलो. वीसेक मिनिटातच हॉस्टेलची पाटी दिसली. चेक इन
केलं आणि सरळ बेडवर आडवा झालो.  

सकाळी जाग आली तेव्हा साडेदहा वाजले होते. हॉस्टेलमधली
ब्रेकफास्टची वेळ कधीच संपली होती. मग बाहेर पडलो आसपासचा परिसर बघायला.
समुद्रकिनारा अक्षरशः ढेंगभर अंतरावर होता. काल रात्री सामसूम वाटलेला हा परिसर
आता मात्र पर्यटकांनी फुलून गेला होता. मी एका लहानशा उपहारगृहात ब्रेकफास्ट केला
, लोकल सिम कार्ड घेतले, आणि
हॉस्टेलवर परतलो. बालीमध्ये फिरायला एक स्कूटर मी आधीच बुक करून ठेवली होती.
ठरल्याप्रमाणे स्कूटरवाला हॉस्टेलवर हजर झाला. सगळी औपचारिकता पूर्ण करून मी
स्कूटरचा ताबा घेतला. पाच मिनिटं शांतपणे बसून आज कुठे कुठे जायचे आहे त्याची एक
रूपरेषा बनवली. मग सगळी तयारी करून हेलमेट चढवले आणि गणपती बाप्पा मोरया म्हणत
स्कूटर चालू केली.            

क्रमशः 

3 thoughts on “नयनरम्य बाली – भाग 1 – तोंडओळख आणि सहलीची सुरुवात Beautiful Bali – Part 1 – Introduction and the beginning of the trip

  1. खूप सुंदर शब्दांकन…..लवकर पूढील अंक वाचण्याची प्रतीक्षा करतोय….
    -निलेश जोशी

Leave a Reply