अविस्मरणीय रूपकुंड – भाग ७ – शेवटचा दिस गोड व्हावा!

पाथार नचुनीच्या कॅम्प साईटवरची ती पहाट जरा आळसावलेलीच होती. गेल्या दोन दिवसांतल्या तंगडतोडीने थकलेल्या गात्रांना आता घरची ओढ लागली होती. काश teleportation शक्य असते. पण रूपकुंड काही इतक्या सहजासहजी घरी पोहोचू देणार नव्हते. ज्या वाटेने चढायला तीन दिवस लागले होते ती वाट आज एका दिवसात उतरून जायची होती. एकूण अंतर होते १७ किमी! पण वाट उताराची होती. शिवाय ऑक्सिजनचे प्रमाण वाढत जाणार होते. त्यामुळे अंतराचे फारसे भय नव्हते. नाश्त्याला आज आलू पराठ्यांचा बेत होता. इतक्या सगळ्या लोकांसाठी पराठे लाटून होईपर्यंत आठ वाजले. पण यावेळी पराठे मात्र फक्कड जमले होते. गरमागरम पराठे ओरपून आम्ही खाली उतरायला सज्ज झालो. 

वातावरण फोटोग्राफीसाठी एकदम अनुकूल होते

ट्रेकमध्ये कायम मागे असणारा मी यावेळी पुढे सरसावलो होतो. वातावरण स्वच्छ होते. उताराच्या दिशेने चालताना ती अजगर-वाट अगदीच सौम्य वाटत होती. कालच्या गारांचा चिखल अधूनमधून त्या भयंकर गारपिटीची आठवण करून देत होता. मधेच ढगांचे पुंजके त्या वाटेला हलकासा स्पर्श करून जात होते. पलीकडे दिसणारी शिखरे त्याच स्थितप्रज्ञतेने सारा निसर्ग न्याहाळत होती. फोटोग्राफीसाठी आज उत्तम वातावरण होते. गेल्या दोन दिवसांतले रौद्र सौंदर्य मनसोक्त कॅमेऱ्यात टिपता न आल्याची थोडी खंत वाटत होती. आज ती कसर भरून काढायचे ठरवले. ग्रुपमधली मंडळी पण एकदम सेल्फी मूडमध्ये होती. रमत-गमत आम्ही बेदिनी बुग्यालपर्यंत पोहोचलो. इथून पुढे रस्ता वेगळा होता. चढताना अली बुग्याल आणि डिडना मार्गे आलो होतो. पण उतरताना मात्र घरोली पाताळ आणि नीलगंगा मार्गे वाण गावात उतरणार होतो. वाट वेगळी असल्याने तिथल्या भूदृश्याबाबत मनात उत्सुकता होती. 

बेदिनी बुग्यालचा पठारी प्रदेश संपून तीव्र उतार सुरु झाला 
हळूहळू रानात उतरणारी वाट 
हळूहळू बुग्यालचा सपाट प्रदेश मागे पडला. तीव्र उतार सुरु झाला. म्हणता म्हणता वाट सरळ गच्च रानात शिरली. त्या उंच झाडांतून निळ्या आभाळाचे लहान-सहान तुकडे मिचमिचताना दिसत होते. वातावरणातली आर्द्रता जाणवत होती. इथे ऱ्होडोडेंड्रॉनची झाडे मुबलक दिसत होती. पण कदाचित या भागातला फुलांचा बहर येऊन गेला होता. फांद्यांच्या टोकांवर फुटलेली हिरवीगार पालवी मोहक दिसत होती. उंच आणि धिप्पाड असे देवदार वृक्ष उतारावर घट्ट मुळे रोवून खंबीरपणे उभे होते. उद्या प्रलय होऊन जग उलटे-पालटे झाले तरी हे वृक्ष जागचे हलणार नाहीत असा दृढ विश्वास त्यांच्या नुसत्या अस्तित्वातून प्रतीत होत होता. या वाटेने चढणे नक्कीच अली बुग्यालच्या वाटेपेक्षा जास्त कठीण होते. इथून चढणारे ट्रेकर्स अजून किती चढायचे आहे असे केविलवाण्या चेहऱ्याने विचारत होते. तसेही ट्रेकिंगमध्ये या प्रश्नाचे उत्तर कधीही “तुम्ही जवळपास पोहोचलातच” असेच द्यायचे असते! आम्हीही तोच कित्ता गिरवत होतो. वर चाललेल्या ट्रेकर्सना शुभेच्छा देत आम्ही खाली उतरत होतो. 

घनदाट रानात वसलेली घरोली पाताळ ची कॅम्प साईट 

अचल देवदार 
दोनेक तासांच्या उतरणीनंतर घरोली पाताळची कॅम्प साईट दिसू लागली. घनदाट रानाच्या मध्यात एका लहानशा पठारावर ती कॅम्प साईट वसली होती. इथली उंची होती २४०० मीटर. ऑक्सिजन पातळीच्या दृष्टीने आम्ही आता ‘सेफ झोन’ मध्ये आलो होतो. थोडावेळ तिथे विश्रांती घेऊन आम्ही पुढे निघालो. दूरवरून वाहत्या पाण्याचा खळखळ आवाज येऊ लागला. नीलगंगा जवळ येत असल्याची ती खूण होती. आम्ही पावलांचा वेग वाढवला. नागमोडी वळणांना छेद देत उतारावरून घसरगुंडी करत खाली उतरण्यात मजा येत होती. आता खोल दरीतला पाण्याचा प्रवाह दिसू लागला. नदीच्या काठावर एक तात्पुरती शेड उभारलेली दिसत होती. आमची जेवायची सोय  इथेच होती. एकदाचे तिथे पोहोचलो. त्या अरुंद दरीतून नीलगंगेचा अवखळ प्रवाह खळखळ करत पुढे चालला होता. आजूबाजूचे डोंगर आणि वृक्षराजी त्या प्रवाहात आपले रुपडे पाहण्यात गुंतले होते. आतापर्यंत अनुभवलेल्या रौद निसर्गरुपांपुढे हे शांत आणि लोभस रूप मानला एक वेगळाच आनंद देत होते. बूट काढून नदीच्या पाण्यात पाय बुडवले. थंडगार पाण्याचा पायांना स्पर्श होताच सारा थकवा दूर झाल्यासारखे वाटले. काश त्या पाण्यात यथेच्छ डुंबता आले असते. पण अजून एक चतुर्थांश अंतर बाकी होते. नाईलाजानेच पाण्याबाहेर आलो. गरमागरम राजमा चावल तयारच होते. जेवण होतंय ना होतंय तेवढ्यात ढग दाटून आले आणि पावसाच्या सरी सुरु झाल्या. हा पाऊस काही आमचा पिच्छा सोडायला तयार नव्हता. ट्रेकमधल्या प्रत्येक दिवशी साधारण दुपारच्या वेळी वेळापत्रक ठरल्यागत तो हजेरी लावत होता. आता शेवटचे एक चतुर्थांश अंतर पावसात पार करणे अगदी जीवावर आले होते. पण दुसरा पर्याय काय? रेनकोट घातले आणि चालायला सुरुवात केली. 


खोल दरीत दिसणारा नीलगंगेचा प्रवाह 
नदीवरच्या अरुंद पुलावरून पलीकडे गेलो आणि पाहतो तर काय, वाट सरळ समोरच्या टेकडीवर चढत होती! ट्रेकचा उरलासुरला भाग, त्यात पाऊस, आणि परत चढण? आता मात्र हद्द झाली! कधी संपणार हा ट्रेक? स्वखुशीने तर आलो आपण ट्रेकला. ना कोणी जबरदस्ती केली होती ना कोणी बक्षीस देणार होतं ट्रेक पूर्ण केल्याचं. मग कशाला आलो आपण इथे तंगडतोड करायला? प्रत्येक ट्रेक मध्ये कोणत्या ना कोणत्या क्षणी हे असे विचार मनात येतातच. आता पुन्हा असले उपद्व्याप नाही असं कुठेतरी मन ठरवूनही टाकतं. पण पुन्हा दोन-चार महिन्यांनी गिरीशिखरांचे वेध लागू लागतात. त्या अनवट निसर्गाचा उपभोग घेण्यासाठी जीव झुरू लागतो. आणि पुन्हा कधीतरी मी असा पावसा-पाण्यात, निसरड्या वाटेवर, ‘अजून किती चढायचं आहे’ असं विचारत चढू लागलेला असतो. व्यसन म्हणावं तर यालाच का? त्या तांबूसराड वाटेवरून हळूहळू वर चढताना मन ट्रेकिंग करण्यामागच्या मूलभूत प्रेरणेचा शोध घेत होतं. स्वतःला निसर्गाच्या हवाली करण्यात एक अध्यात्मिक आनंद आहे. शरीराच्या कितीही अपेष्टा होत असल्या तरी मनाला मिळणारे समाधान शब्दातीत आहे. प्रत्येक ट्रेक काहीतरी नवीन शिकवून जातो. नवे सवंगडी मिळवून देतो. ट्रेकमधले ते भले-बुरे क्षण आठवणींच्या गाठोड्यात मुरत जातात आणि आयुष्याची चव उत्तरोत्तर अधिक रुचकर करत जातात.

वाण  गावातला बऱ्याच दिवसांनी दिसलेला पक्का गाडी रस्ता 
चढण संपता संपता एक गाव लागलं. आम्ही ट्रेकर्स दिसताच गावातली लहान-सहान पोरं गलका करत जमा झाली. आपल्या गोड आवाजात ती पोरं सगळ्यांना नमस्ते म्हणत होती. ट्रेकच्या या शेवटच्या दिवशी पोरांमध्ये वाटायलाही काही उरलं नव्हतं. पाऊस आता थांबला होता. गावाशेजारी एक हॉटेल होतं. तिथे थोडा वेळ थांबून आम्ही पुढे निघालो. लहान-मोठ्या वस्त्यांमधून ती वाट पुढे जात होती. काही वेळातच थोडे मोठे गाव दिसू लागले. वाण गावच्या मुख्य चौकात उतरणारी ती शेवटची पायरी आम्ही उतरलो आणि अत्यानंदाने एकमेकांना टाळ्या दिल्या. ट्रेक संपल्याचा तो क्षण म्हणजे अवर्णनीय असाच होता. गावातल्याच एका दुकानात चहा पिऊन आम्ही तो ट्रेकांत साजरा केला. इथून पुढे जीपने लोहाजुंगच्या बेस कॅम्प वर जायची सोय केलेली होती. लोहाजुंगला पोहोचलो तेव्हा संध्याकाळचे सहा वाजले होते. झोपायला गादी आणि पांघरायला दुलई म्हणजे ऐषाराम वाटत होता. सगळ्यांनी एकत्र जमून रघू, विकी, आणि विजयेंद्रजी यांचे मनःपूर्वक आभार मानले. विकीला त्याच्या करियरसाठी शुभेच्छा दिल्या. कुंडदर्शन हुकल्याची काहीशी रुखरुख मनाला जाणवत होती. आयुष्यात परत कधी योग आला तर कुंडदर्शनासाठी नक्की येईन असे मनाशी ठरवून ‘ज्याचा शेवट गोड ते सारेच गोड’ या न्यायाने गोड मानलेल्या रूपकुंडला मनोमन अलविदा केले आणि अंगावर दुलई ओढून झोपी गेलो.                                                                     
समाप्त 

Leave a Reply